श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वार्ड नंबर 7 मधील मोरगे वस्ती परिसरातील कल्याणी धीरज पाटोळकर (वय 34) या विवाहितेचा मृतदेह आज (रविवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील खंडाळा येथील रांजणखोल रस्त्यालगत अचानकनगर येथे पाटाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी सांगितले की, मृत विवाहिता कल्याणी हिच्या (बाभळेश्वर, ता. राहाता) येथील माहेरच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कल्याणीचा पती धीरज पाटोळकर अधून-मधून कल्याणीशी वाद घालत होता. या वादातूनच धीरज हा कल्याणी हिला मारहाण करून तिचा राग-राग करत होता.
दरम्यान, मृत कल्याणी हिचे बंधू संभाजी अरुण लोळगे (रा. बाभळेश्वर) यांनी मेहूणा धीरजसह त्याची आई, वडील,ननंद व आणखी एका तरुणीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याणी हिचा घातपात झाला असावा, असा खळबळजनक आरोप लोळगे परिवाराने केला आहे.
दरम्यान, सकाळी 10 वाजता खंडाळा शिवारात पाटाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेत कल्याणीचा मृतदेह आढळल्याने पुलाजवळ बघ्यांची एकच गर्दी दाटली होती. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पो. पा. कृष्णा अभंग यांना दिली. त्यांनी याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांना कळविले. याप्रकरणी डिवायएसपी संदीप मिटके, पो. नि. संजय सानप व स.पो. नि. जीवन बोरसे करीत आहेत.