नगर : जिल्ह्याच्या मदतीला धावले औरंगाबाद, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठयासाठी घेतला पुढाकार
नगर : पुढारी वृत्तसेवा: दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरची निविदा प्रसिध्द केली. परंतु राज्यभरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नाईलाजस्तव औरंगाबाद येथून 4 शासकीय टँकर मागवावे लागले आहेत. त्यामुळे आजमितीस 26 टँकरव्दारे 46 गावे आणि 146 वाड्यावस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.
सलग दोन वर्षे जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसांत जिल्ह्याला पाणीटंचाई परिस्थिती जाणवली नाही. मात्र, खबरदारी म्हणून दरवर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीसाठी टँकरची निविदा प्रसिध्द केली जात आहे.गेल्या वर्षी फक्त दहा बारा गावांत पाणीटंचाई होती. त्यामुळे 22 शासकीय टँकरव्दारे संबंधित गावांना मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे ठेकेदाराचे टँकर जागेवरच उभे होते.
प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट सुरू; नगर तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
यंदा देखील परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे फक्त 46 गावांत पाणीटंचाईची झळ सुरु आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपर्यंत 22 शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. दरम्यान, यंदा जिल्हा प्रशासनाने टँकरसाठी चारवेळा फेरनिविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासकीय टँकरवरच यंदा काम सुरु आहे.अशा परिस्थितीत पाऊस दडी मारत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे.
जिल्ह्यात फक्त 22 शासकीय टँकर आहेत. आणखी चार टँकरची आवश्यकता असल्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून चार टँकरची मागणी केली. त्यानुसार औरंगाबाद प्रशासनाने जिल्ह्यासाठी चार शासकीय टँकर उपलब्ध करुन दिल्याने, जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
…तर टँकरचा प्रश्न भेडसावणार
दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त गावांची संख्या पन्नासच्या आतच राहिली. गेल्या वर्षी फक्त शासकीय टँकरचीच गरज भासली. त्यामुळे ठेकेदाराचे टँकर जागेवरच उभे होते. आजमितीस टंचाईग्रस्त गावांची संख्या 46 आहे. त्यामुळे 22 शासकीय टँकर कमी पडले. त्यामुळे बाहेरुन चार टँकर मागविले. पावसाने दडी मारल्यास टँकरचा प्रश्न पुन्हा भेडसावणार आहे.