नगर: तर शेतकरी राहणार हप्त्यापासून वंचित; तीन लाख ई-केवायसीच नाही
नगर : पुढारी वृत्तसेवा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना ई-केवायसी करुन घेणे बंधनकारक केले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 37 हजार 195 लाभार्थी शेतकर्यांनी ई- केवायसी केले आहे. अद्यापि 3 लाख 13 हजार 470 लाभार्थी ई-केवायसीपासून दूर आहेत. यासाठी शेतकर्यांना 31 मेची डेडलाईन आहे. येत्या चार दिवसांत ई-केवायसी करुन घ्या अन्यथा अकरावा हप्ता मिळणार नाही असा इशारा शासनाने दिला आहे.
केंद्र सरकर पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकर्यांना दरवर्षी 6 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे अनुदान चार महिन्यांत 2 हजार रुपये दिले जात आहे. या अनुदानाने गोरगरीब जनतेला थोडासा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सन 2019 पासून देशभरात किसान सन्मान निधी योजना सुरु झाली आहे.जिल्ह्यात 7 लाख 5 हजार 933 शेतकरी असून, आजपर्यंत 6 लाख 50 हजार 665 शेतकर्यांनी बँक खात्याशी आधार नोंदणी केलेली आहे.आतापर्यंत लाभार्थी शेतकर्यांना दहा हप्ते वितरित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश 2030 पर्यंत ड्रोन हब
जिल्ह्यासाठी एकूण 11 अब्ज 23 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकर्यांना ई-केवायसी करुन घेण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी 31 मार्च 2022 ची डेडलाईन दिली होती. त्यानंतर सरकारने पुन्हा 31 मे 2022 पर्यंत ई-केवायसी करुन घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 27 मेपर्यंत 52 टक्के लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी करुन घेतली आहे.
राज्यातील सर्व परीक्षा आता ऑफलाईनच होणार
एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांचा अकरावा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी करण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत 3 लाख 13 हजार लाभार्थी ई-केवायसीपासून दूर आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना अकरावा हप्ता मिळणे अवघड होणार आहे. ई- केवायसी केल्यानंतरच दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.
ई-केवायसीपासून दूर लाभार्थी संख्या
अकोले 23,384, जामखेड 14,193, कर्जत 20,901, कोपरगाव 19,758, नगर 22,117, नेवासा 27,117, पारनेर 31,221, पाथर्डी 19,385, ,राहाता 15,575, राहुरी 21,144, संगमनेर 33,153, शेवगाव 26,005, श्रीगोंदा 27,597, श्रीरामपूर 11,920.