नगर : ऊसतोड मिळेना म्हणून उसाला आग लावली, नंतर शेतकऱ्याची औषध पिऊन आत्महत्या | पुढारी

नगर : ऊसतोड मिळेना म्हणून उसाला आग लावली, नंतर शेतकऱ्याची औषध पिऊन आत्महत्या

अहमदनगर; वृत्तसेवा : ऊसतोड अभावी एका शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना जोहरापूर (जि. अहमदनगर) येथे घडली आहे. ऊसतोड मिळत नसल्याने उसाला आग लावली व नंतर या शेतकऱ्‍याने औषध पिऊन स्वत:ला संपवले. उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्याच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे.

शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील जनार्धन सिताराम माने (वय ७०) या वृद्ध शेतकऱ्याने अनेक फेऱ्या मारूनही आपल्या उसाला तोड मिळत नसल्याने मंगळवारी (दि.५) दुपारी २ वाजता स्वत:च्या हाताने उसाला आग लावली व नैराशातून उसाच्या फडात विषारी औषध पिऊन आत्महत्त्या केली. या शेतकऱ्यास उपचारासाठी शहरातील नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान बुधवारी (दि.६) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने साखर कारखाना विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांची पिळवणूक घेणाऱ्या साखर कारखान्याबाबत रोष निर्माण झाला आहे.

मयत शेतकरी जनार्धन माने हे खामगाव येथील आपल्या पावणे तीन एकरातील उसाला तोड मिळावी यासाठी महिन्यापासुन कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे विनंत करत होते. पंरतु, त्यांना दरवेळी पुढील तारीख दिली जात होती. विनवण्या करुणही ऊसतोड लांबत चालल्याने नैराशाने जनार्धन माने यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा जबाब मयत शेतकरी यांचा मुलगा संतोष जनार्धन माने यांनी पोलिसांना दिला आहे.

Back to top button