Maratha reservation update : जरांगेची राज्यव्यापी रास्ता रोकोची हाक; २४ फेब्रुवारीपासून आंदोलन | पुढारी

Maratha reservation update : जरांगेची राज्यव्यापी रास्ता रोकोची हाक; २४ फेब्रुवारीपासून आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी आंदोलन शांततेत सुरु राहील, असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (दि.२४) पासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषदेत दिली. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल. ३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. यानंतर मुंबई हाेणार्‍या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. ( Manoj Jarange appeal For Rasta Roko Movement )

Maratha reservation update : या वेळेत होणार रास्ता रोको आंदोलन

यावेळी जरांगे-पाटील म्‍हणाले,  “मराठा राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येवू नये. नेता आपल्या दारी आला तर दार लावा. आता आपण आपली ताकद दाखवून द्यायची आहे. ही नेत्‍यांना गावबंदी नाही, असे सांगत मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेवू नका, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

दररोज रास्ता रोको आंदोलन करुन सरकारला जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन द्यावे. यापुढे राज्यभर आंदोलन रस्त्यावर उतरुन होईल. हे आंदोलन होताना कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.  रास्ता रोको आंदोलन येत्या २४ फेब्रवारीपासून रोज सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान करायचे आहे. ज्यांना ही वेळ जमत नसेल त्यांनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत करावे.”

उपोषण करताना कोणाचं बर-वाईट झाल्यास फडणवीस-शिंदे जबाबदार

“मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेवू नका निवडणूक घेतल्यास प्रचाराला आलेल्या गाड्या ताब्यात घ्या. आंदोलन करत असताना लोकशाही, कायदा, आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्या. आंदोलनाला बसताना एका रांगेत सर्वांनी उपोषणाला बसावे. आंदोलन करत असताना कोणाचं बर वाईट झाल्यास त्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जबाबदार राहतील, असेही ते म्‍हणाले. गेल्या ५०० वर्षात असं अन्यायकारकं सरकार झालं नसेल, अशी टीकाही त्‍यांनी केली.

Maratha reservation update : सर्व वृद्धांनी आंदाेलनात सहभागी व्‍हावे 

२४ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान सरकारने  सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्धांनीही या आंदोलनाला बसायचे आहे. जर आंदोलना दरम्यान कोणत्याही वृद्धांचा मृत्यू झाला तर याला सरकार जबाबदार राहील. राज्यात २५ ते ३०  लाखच्या आसपास वृद्ध असतील. माझ्या आई-बाबसह सर्व वृद्ध उपोषणाला बसतील, असेही जरांगे-पाटील म्‍हणाले.

३ मार्च रोजी सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको

“सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी एकाचवेळी म्हणजे १२ ते १ या वेळेत रास्‍ता राेकाे आंदोलन केले जाईल.  हे आंदोलन ३ मार्च रोजी होईल. या दिवशी राज्यात मुंबईसह सर्व  जिल्हाच्या वतीने एकच आंदोलन करायचं आणि गावच्या गाव तिथे यायचं आहे. जगातील सर्वात मोठा रास्ता रोको आंदोलन करा, असे आवाहन त्‍यांनी केले.

मी असेपर्यंत आंदोलन शांततेच्‍या मार्गानेच

मी आहे  तोपर्यंत आंदोलन शांततेच्‍या मार्गानेच होईल. एकदा सुरु झालं की, शेवट होईपर्यंत शिवाय मागे हटणार नाही. आतापर्यंत प्रत्येक आंदोलनाला यश मिळाले आहे. या आंदोलनाने जगाच्या पाठीवर सरकारची नाचक्की होईल. एकदा का सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की कसा गुलाल उडतो बघा. मुस्लिम, धनगर आरक्षण कसं मिळत नाही हेही पाहू, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

३ मार्चनंतर मुंबईतील आंदाेलनाची दिशा ठरवू

आपल्याच दारात राहून आंदोलन करायचं आहे. येत्या १ मार्च रोजी राज्यभरातील मराठा लोकप्रतिनिधींची बैठक होईल. मराठा समाजाचा विरोधक कोण आहे हे समोर पुढे आणा. फुटलेला माणूस कधीच तोंडावर बोलत नाही. तुम्ही सगळे या म्हणजे विरोध स्पष्ट होईल. ३ मार्चच्या रास्तारोकाे आंदाेलनानंतर  मुंबई आंदोलनाची दिशा स्पष्ट करु, असेही त्‍यांनी जाहीर केले.

हेही वाचा : 

Back to top button