Yashawantrao Mohite : भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!! | पुढारी

Yashawantrao Mohite : भाऊंमुळेच 'लालपरी' रस्त्यांवरून धावते !!!

पुढारी ऑनलाईन डेस्क

सर्वसामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय आणि आता उच्चमध्यमवर्गीय, अशा बहुसंख्य वर्गाला इप्सित स्थळी जायचं असेल तर डोळ्यांसमोर पहिल्यांदा दिसते ती आपली लालपरी… आपल्या खिशाला पडवडणारी आणि दूरदूरच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणणारी लालपरीचा प्रवास प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कसा झाला माहितीय? नाही ना? तर आजच्या एसटी बसला म्हणजेच लालपरीला खरी ओळख यशवंतराव मोहिते (Yashawantrao Mohite) यांच्यामुळे मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. कसं ते पाहू…

१९६० मध्ये ‘परिवहन खातं’, अशा नावाचं खातं नव्हतं. त्यावेळी यशवंतराव मोहिते (Yashawantrao Mohite) म्हणजेच भाऊंना एसटीचा कारभार पाहावा लागत होता. सभागृहात भाऊंना त्यासंदर्भात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागत होती. त्यामुळे लालपरीतून प्रवास करणाऱ्यांसाठी भाऊंनी जनहिताचे निर्णय घेतले. त्यातून प्रवासी वाहतूक सेवेचा राज्य सरकारच्या अखत्यारित घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, विदर्भातून त्याला जोरदार विरोध झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्यणावर बंधनं आली.

निवणडणुकीचा विचार करता खुद्द यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला. भाऊंनी तो ऐकला आणि ६२ च्या निवडणुकीत काॅंग्रेसला मोठं यश मिळालं. त्यानंतर भाऊंनी लगेचच एसटीला राज्य सरकारच्या अखत्यारित आणून टाकले. प्रवाशांची सोय व्हावी, हा भाऊंचा उद्देश होता. भाऊंनी मग नव्या भागांमध्ये नव्या एसटी बसेस सुरू केल्या, बसेसची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती केली, अर्थकारण व्यवस्थित ठेवण्यासाठी माफक भाडेवाढ केली आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ घातला.

एसटी महामंडळाचा कारभार कसा गतिशील आणि विकसित होईल, याकडे भाऊंचं चांगलं लक्ष होतं. यासाठी त्यांनी महामंडळावर पंतगराव कदम, शिवाजीराव भोसले, बराले, हिरुभाऊ जगताप, शशिकुमार देशमुख या मान्यवर सदस्यांना नियुक्ती करून घेतली. भाऊंनी या सदस्यांच्या माध्यमातून एसटी महामंडळात जास्तीत जास्त सुधारणा करून घेतला.

या निर्णयामध्ये ज्यादा लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी मोठी बसस्थानके, पीक अप शेड, बसस्टाॅप्स बांधली. यातून प्रवाशांची ऊन पावसातून सुटका झाली. महत्वाचं म्हणजे वाहतुकी अभावी मैलोनमैल पायी चालत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी ज्यादा गाड्या सोडल्या. खेड्यातील मुलं शहराच्या ठिकाणी शिकण्यासाठी जाऊ लागली. इतकंच नाही तर शेतमाल, दूध, भाजीपाला शहराच्या ठिकाणी पोहचू लागला. त्याचा थेट सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या जडणघडणीवर झाला.

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आंदोलनात सहभाग

भाऊंनी ‘गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी’ हे धोरण आखल्यामुळे गावखेड्यांत लालपरी धावू लागली. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत लालपरीच्या धावण्याने फायदा झाला. यातून महाराष्ट्राचं अर्थकारण भक्कम झालं आणि थेट जनतेला त्याचा फायदा मिळाला. एसटी महामंडळाच्या संदर्भात निर्णय घेताना भाऊंनी कोकण, मराठवाडा, विदर्भ यांच्याबाबतीत कोणताही भेदभाव न करता पश्चिम महाराष्ट्राइतकाच खर्च केला.

कर्मचाऱ्यांचे पगार, एसटीचे टायर, सुटे भाग, एसटीचे दुरुस्ती आणि त्यांची देखभाल यांचा खर्च वाढला. पण, भाऊंनी त्याची झळ सामान्य प्रवाशाला बसणार नाही, याची काळजी घेतली. तुटपुंज्या नफ्यात चालणारे एसटी महामंडळ प्रवाशांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, याचा एक उत्तम आदर्श भाऊंनी म्हणजे यशवंतराव मोहिते यांनी घालून दिला. त्यामुळे आजही एक जरी प्रवासी बसमध्ये असला तरी लालपरी रस्त्यांवरून धावते.

पहा व्हिडीओ : एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय म्हणातात, “नवरा घरात येईपर्यंत जीवात जीव नसतो”

Back to top button