पुढारी ऑनलाईन : पवार कुटूंब फोडण्याचा काही लोकांकडून प्रयत्न होत आहे. आम्ही इथे भांडतोय अन् भाजप 'एसी' मध्ये बसून याची मजा बघत आहे. कुटूंबात निर्माण झालेली परिस्थिती पाहून मलादेखील माझे आई-वडील म्हणाले की, 'तू देखील असेच वागणार का?'. अनेक नागरिकांना देखील असाच प्रश्न पडत आहे, अशा शब्दांमध्ये राेहित पवार यांनी राष्ट्रवादीतील अजित पवार गटावर हल्लाबाेल केला. (Maharashtra NCP Crisis)
पत्रकार परिषदेत बाेलताना रोहित पवार यांनी अजित पवारांच्या सरकारमध्ये सहभागी हाेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी अजित पवार यांना 'तुमच्या भाजपविरोधी भूमिकेचं काय झालं? असा सवाल देखील केला आहे. (Maharashtra NCP Crisis)
तात्पुरत्या सत्तेसाठी तुम्ही तुमचे विचार, विचारसरणी सोडली असेल, तर जनतेने काय विचार करायचा? असा सवाल करत मी एका विचारधारेमुळेच आजही आजोबांसोबत आहे, असेही राोहित पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला; पण तो एका विचाराने सोडला. यामुळे पुढे काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीची देखील विचारसरणी असल्याने पक्षात कृती करणे शरद पवारांना सोपे झाले. त्यांनी त्यांचा विचार कायम ठेवला, शरद पवार यांच्यासाेबत राहूनदेखील अनेकांना त्यांचे विचार कळलेच नाहीत, अशी खंत देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली. (Maharashtra NCP Crisis)