Nana Patole Tweet : राज्यपालांची रवानगी गुजरात किंवा राजस्थानला करा : नाना पटोले | पुढारी

Nana Patole Tweet : राज्यपालांची रवानगी गुजरात किंवा राजस्थानला करा : नाना पटोले

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत (Nana Patole Tweet) राज्यपालांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप राज्यपालांचा निषेध व्यक्त करणार का ? असा सवालही त्‍यांनी केला आहे.

Nana Patole Tweet :… हे अत्यंत अशोभनीय 

नाना पटाेले यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेले विधान अतिशय संतापजनक आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर असतानाही कोश्यारीजी यांनी मागील काही काळात आपल्या विधानातून आणि कृतीतून अनेक वेळा महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या महाराष्ट्रभूमीत जन्मलेल्या छत्रपती शिवराय, आनंदीबाई जोशी, दादासाहेब फाळके आदी महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वातून जगात देशाची कीर्ती पोहचवली आणि त्याच महाराष्ट्रभूमीबद्दल बोलताना राज्यपालांचा समतोल ढासळणे हे अत्यंत अशोभनीय आहे.

Nana Patole Tweet : राज्यपालांचा निषेध व्यक्त करतील का ? 

मराठी माणसाने आपल्या घामातून आणि वेळेप्रसंगी आपले रक्त सांडून ही वैभवशाली मुंबई नगरी उभी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून स्वतःला मराठीचे तारणहार म्हणवणारे महाराष्ट्रातील भाजप नेते आता राज्यपालांचा निषेध व्यक्त करतील का ?, असा सवालही पटाेले यांनी केला आहे. राज्यपालांनी आपल्या वक्त्यव्यातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५ हुतात्म्यांचा अवमान केला आहे. केंद्र सरकारने कोश्यारीजी यांचा राजीनामा घेऊन त्यांची रवानगी तात्काळ त्यांची विशेष पसंती असलेल्या गुजरात किंवा राजस्थानला करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे. 

हेही वाचलंत का?

Back to top button