पुणे : पुढारी वृत्तसेवा
वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडणार्या पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 16 हजार 243 पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी राज्यात आघाडी घेतली आहे.
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला, तरी वीजबिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे; तसेच प्रतिबिल 10 रुपये सवलतदेखील देण्यात येत आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 80 हजार 916, सातारा 8511, सोलापूर 8615, कोल्हापूर 10 हजार 95 आणि सांगली जिल्ह्यात 7286 वीजग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेत सहभाग घेतला आहे.
ल्या वर्षभरात 'गो-ग्रीन' योजनेत पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत 31 हजार 200 वीजग्राहकांचा सहभाग वाढला आहे. महावितरणची पर्यावरणपूरक 'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.
पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी महावितरणकडून 'गो-ग्रीन' योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल, तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तत्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. संकेतस्थळावर मागील 11 महिन्यांची अशी एकूण 12 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.
https://youtu.be/m5yyfqkYqY4