

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा
सासवडहून उरुळी कांचनकडे 22 प्रवासी घेऊन निघालेल्या पीएमपीएमएल बसचे शिंदवणे घाटात ब्रेक निकामी झाले. परंतु, चालकाने प्रसंगावधान दाखवून दोन अवघड वळणे पार करीत बसला रस्त्याकडील भागात घालून थांबविण्याचे धाडस केल्याने बसमधील 22 प्रवाशांचा जीव वाचला. यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.
सासवडहून सकाळी 7 वाजता ही बस उरुळी कांचनला निघाली होती. शिंदवणे घाटात ही बस आली असता बसचे ब्रेकनिकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालक किशोर कदम यांनी तत्काळ गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दोन ठिकाणच्या वळंणाहून गाडी पुढे गेली व बाजूला असलेल्या डोंगराच्या बाजूला धडकून थांबवली.
गाडी रस्त्याच्या कडेला थांबविल्याने 22 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर प्राण वाचल्याने प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.
चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते, तर ही बस 22 प्रवाशांसोबत दरीत कोसळली असती.
खा. सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून तसेच पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सासवड-शिंदवणे-घाटमार्गे उरुळी कांचन अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे ही वाचा :