

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले होते. यावर माध्यमांशी बाेलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे खूप दुःखद आहे, नवाब मलिक यांनी खूप मेहनत करून आपली कारकीर्द घडवली आहे. मलिक महायुतीत नकाे हाेते तर देवेंद्र फडणवीस यांना संबंधितांना फोन करता आला असता. असे काय झाले की त्यांनी पत्र लिहून ते मीडियात लीक केले?, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे की, माजी मंत्री आणि विधानसभेचे सदस्य नवाब मलिक आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही. हे मी प्रारंभीचं स्पष्ट करतो. (Devendra Fadnavis on Nawab Malik) मात्र ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत. ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा आहे. सध्या नवाब मलिक केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने ते बाहेर आहेत. त्यांच्यावरिल आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांचे आपण स्वागत करु, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Nawab Malik)
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. मात्र, महायुतीला बाधा पोहचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो, असे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले आहे. नवाब मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडीशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाहीत. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी आशा आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. (Devendra Fadnavis on Nawab Malik)