नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
2021 मध्ये वृद्धापकाळासह विविध कारणांमुळे 127 वाघांचा मृत्यू झाल्याचे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले. तर 2020 मध्ये 106 वाघांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये 96 वाघांचा मृत्यू झाला. वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, वाघांच्या मृत्यूची अनेक कारणे आहेत. यामध्ये म्हातारपण, वाघांमधील लढाई, विजेचा शॉक, रोग आणि शिकार इत्यादींचा समावेश आहे.
यादव म्हणाले की, राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये 127 वाघांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी मध्य प्रदेशात सर्वाधिक ४२ वाघांचा मृत्यू झाला, त्यानंतर महाराष्ट्रात २७, कर्नाटक १५ आणि उत्तर प्रदेशात नऊ वाघांचा मृत्यू झाला.
ते म्हणाले की, जंगलात वाघांचे सरासरी आयुष्य 10-12 वर्षे असते आणि नैसर्गिक परिसंस्थेमध्ये म्हातारपण, रोगराई, आपापसात भांडणे, विजेचा धक्का, बुडणे, रस्ते आणि रेल्वे अपघातात जखमी होणे यासारख्या कारणांमुळे वाघांचा मृत्यू होतो.
ते म्हणाले की, वन्यजीव आणि मानवी संघर्षांवर मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळी शिकारीविरोधात कठोर कारवाई करत आहे. मात्र, वाघांची संख्या दुपटीने वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का?