![सातारा : विकासाआड येणार्या अधिकार्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही; खा. उदयनराजे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F01%2Fudayanraje.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा : पुढारी वृत्तसेवा
विकासकामे लोकांच्या गरजेप्रमाणे आणि मागणीनुसारच सुचवली जातात. ती कामे कोणता प्रशासकीय अधिकारी करतो हे महत्त्वाचे नाही. सुचवलेली विकासकामे वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत. या कामांमध्ये अनावश्यक अडवणूक करणार्या अधिकार्यांचा अजिबात मुलाहिजा ठेवला जाणार नाही. लोकहिताची कामे मार्गी लागली पाहिजेत, असा सज्जड इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला.जलमंदिर पॅलेस येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा मृदसंधारण अधिकारी, लेखा अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, प्रशासकीय यंत्रणांनी केवळ कामाच्या काही तांत्रिक समस्या असतील अशी कामे सोडून तातडीने प्रस्तावित कामे करणे अपेक्षित आहे. परंतु काही वेळा कामे कोणी सुचवली यावरुन प्रशासकीय यंत्रणा कामांच्या नस्ती हाताळत असतात. ही बाब प्रशासनाला शोभणारी नाही. अशा मानसिकतेमुळे अंतिमत: समाजाचे मोठे नुकसान होत असते. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांबाबत त्या-त्या विभागांनी आपली जबाबदारी पार पाडून कामांना गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना उदयनराजेंनी दिल्या.
दरम्यान, सातारा शहरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिकेत येऊन प्रशासनाकडून सोमवारी घेतला.
खा. उदयनराजे म्हणाले, शहरात विविध योजनांतून कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. शहरात कचर्याची समस्या आहे. घंटागाडी नियमित येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधित भागात घंटागाडी नियमित सुरू करा, अशी सूचनाही खा. उदयनराजे यांनी दिल्या. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, नगररचना विभागाचे सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.