पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल, तळोजा आणि खारघर खिंडीत अवैध पद्धतीने वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करून जिल्हा प्रशासनाने कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. तसेच अनेक मुद्देमाल जागेवर नष्ट केला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत ४ मोठया बार्ज आणि ४ मध्यम बार्ज व २ छोट्या संक्शन पंपच्या बोटी अशा १० बोटीवरती धडक कारवाई करण्यात आली आहे. संबधितांविरुद्ध एन.आर.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील खाडी परिसरात अनधिकृतपणे वाळू उपसा करून निसर्गाला हानी पोहचविण्याचे काम वाळू माफियांकडून सुरू होते. याबाबत वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. यावरून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी कोणतीही सूचना न देता अचानक वाळू माफियांच्या खाडी भागातील अनधिकृत बोटीवर धाड टाकून कारवाई केली. या धाडीत ४ मोठ्या बार्ज आणि ४ मध्यम बार्ज व २ छोट्या संक्शन पंपच्या बोटी अशा १० बोटीवरती धडक कारवाई करण्यात आली आहे.
खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात ६ बार्ज देण्यात आलेल्या आहेत व संबधितावरती ४१ डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २ बोटी एन.आर.आय. पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत व संबधितांविरुद्ध एन.आर.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ बोट गाळामध्ये फसली असल्याने जागेवरती नष्ट करण्यात आली. १ बोट एन.आर.आय. पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यावर कार्यवाही चालू आहे. तसेच ५ संक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल केलेल्या कारवाईत पाण्यामधून जप्त करुन संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंतची ही सर्वात मोठी व धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू माफियायांचे धाबे दणाणले आहेत.
अचानक केलेल्या कारवाईत जिल्हा प्रशासनाला घटनास्थळी कोट्यवधींचा मुद्देमाल देखील मिळाला आहे. मात्र या कारवाई दरम्यान एक ही आरोपी प्रशासनाला मिळाला नाही, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आतापर्यत अनेक गुन्हे दाखल झाले, मात्र आरोपी पोलीसांना मिळून आले नाहीत.
हेही वाचा :