राधानगरी (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान आज (दि. २५) दुपारी राधानगरी धरण पूर्ण भरले.
सायंकाळी सातवाजेपर्यंत धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार खुले झाले. यात ३, ४, ५, ६ क्रमांकाच्या दरवाजांचा समावेश आहे.
आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा ३ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आणखी दोन म्हणजे ४ आणि ५ क्रमांकाचे दरवाजे खुले झाले.
सध्या या चार दरवाजांमधून ५५१२ आणि पॉवर हाऊसमधून १४०० असा एकूण ६९१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने भोगावती सह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री विक्रमी 56.3 फुटांवर असलेली राजाराम बंधार्याची पाणी पातळी शनिवारी रात्री 10 वाजता 53 फुटांवर आली. तर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास 51 फुटांवर आली.
चिखली गावाला पुराचा वेढा असून, 'एनडीआरएफ'चे पथक नागरिकांना स्थलांतरित करत आहे.
दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्गावर अजूनही पाणी असून, वाहतूक बंदच आहे.
मोबाईल, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, निम्मे शहर आणि जिल्हा अंधारात आहे. शुक्रवारपासून 76 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, 366 गावे बाधित आहेत.
तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली; पण शहर व जिल्ह्यातील पुराचा वेढा कायम आहे. शनिवारी दिवसभरात लष्कर व 'एनडीआरएफ'च्या पथकांनी 76 हजार 26 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले.
जिल्ह्यातील 366 गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 700 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 98 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील दोन महामार्गांसह 73 मार्ग वाहतुकीसाठी बंद असून, 17 राज्य मार्ग व 55 जिल्हा मार्ग बंद आहेत. राधानगरी धरण 96.17 टक्के टक्के भरले आहे.