भाजपबद्दल ‘सॉफ्ट’ असल्याचा आरोपानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !
मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पराकोटीला जाऊन पोहोचला आहे. भाजप नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीकडून धाडी सुरु असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह खात्याकडून भाजप नेत्यांच्या बाबतीत घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
गृहखात्याला आता ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गृहखात्याकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
ईडीचा ससेमीरा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकील तसेच देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्यावरही ईडी कारवाई झाली आहे. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख अटकेत आहेत. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि अनिल परब यांच्यावरबही भाजपकडून आरोप होत आहेत. मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही ईडीची कारवाई झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी गृह खातं स्वत:कडे ठेवले होते. याच धर्तीवर शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे या खात्याची जबाबदारी आपल्याकडे मागितल्याचे समजते. ईडीच्या दे दणादण कारवाईनंतर प्रत्युत्तर म्हणून संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात पुरावे सादर करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, पत्यक्षात कोणतीच कारवाई न झाल्याने सेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण दरेकरांविरोधात हीच भावना सेनेची आहे.
त्यामुळे आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार, आणि त्यानंतर कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हे ही वाचलं का ?