कृष्णा नदीजोड प्रकल्पास मान्यता

कृष्णा नदीजोड प्रकल्पास मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या कृष्णा खोर्‍यातील जिल्ह्यांत असलेल्या नद्यांच्या पुरामुळे होणारा धोका टाळण्यासाठी 'कृष्णा भीमा नदीजोड प्रकल्प' राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. परिणामी पुरामुळे वाहून जाणार्‍या सुमारे 350 अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यापैकी 50 टीएमसी पाणी भीमा नदीत वळवून सुमारे सव्वालाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत नदीजोड प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

या बैठकीस माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माणचे आमदार जयसिंह गोरे, माढ्याचे आमदार बबन शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर आणि कृष्णा खोरे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोते, कृष्णा खोर्‍याचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले उपस्थित होते. या नदीजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा खोर्‍यातील नद्यांचे पुराचे पाणी भीमा खोर्‍यातील नद्यांमध्ये वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळविल्यानंतर पर्यावरण, केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्यात येईल. प्रकल्पासाठी 'एशियन डेव्हलपमेंट बँके'कडून अर्थसाहाय्य घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

111 किलोमीटरचा बोगदा
'कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्पां'तर्गत कृष्णा नदीमधून सोडलेले पाणी भीमा नदीपर्यंत पोहोचविण्यासाठी बोगदा तयार केला जाणार आहे. सुरुवातीला कृष्णा नदीचे पाणी बोगद्याद्वारे (टनेल) नीरा नदीत येईल. त्यानंतर बोगद्यानेच हे पाणी भीमा नदीपर्यंत पोहोचविले जाईल. सुमारे 111 किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. त्यामुळे पुरात वाहून जाणारे 50 टीएमसी पाणी वळविणे शक्य होणार आहे.

पाण्याचा फायदा कोणाला?
नदी जोड प्रकल्पामुळे पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि नगर जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना पाणी मिळेल. निरा देवघर, निरा उजवा कालवा आणि धोम बलकवडी येथे उपसा सिंचन योजना राबवून कालव्याद्वारे सांगोला, फलटण, माळशिरस, पंढरपूर येथे पाणी पोहोचविले जाणार आहे. नव्याने कालवे तयार करण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या कालव्यातूनच पाणी पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड या शहरांना पुराचा फटका बसतो. दुसरीकडे, मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा हा भाग कायम दुष्काळी राहतो. पुराचे पाणी वाया न जाता त्याचा मराठवाड्यासह सोलापूरला उपयोग व्हावा, यासाठी कृष्णा भीमा नदीजोड प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे. पुराचे पाणी बोगद्याद्वारे नीरा नदीसह उजनीपर्यंत पोहोचवून तेथून सोलापूर शहर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पाठविण्यात येणार आहे.
                                                                      – रणजितसिंह निंबाळकर

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news