नई दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 'सूर्यवंशी' बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. सिनेमाला पहिल्या दिवशीच बंपर ओपनिंग मिळालं होतं. आता दिवसेंदिवस कमाईचा आकडा वाढतच चालला आहे. कतरिना आणि अक्षय सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. 'सूर्यवंशी'ने रिलीजच्या १८ व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. तरण आदर्श आणि बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या चित्रपटाने ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'सूर्यवंशी' चित्रपटाने रविवारी तब्बल ५.३३ कोटींची कमाई केली. आणि एकूण कमाई १७८ कोटींच्या वर गेली आहे. आता हा चित्रपट २०० कोटींचा जादुई आकड्याजवळ पोहचला आहे. ५ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर 'सूर्यवंशी' सिनेमागृहात दाखल झाला होता. सूर्यवंशी देशभरात ४००० हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे, तर जगभरात तो ५२०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
'सूर्यवंशी'चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. 'सिंघम' आणि 'सिम्बा' नंतर हा चित्रपट तिसरा कॉप युनिव्हर्स इन्स्टॉलमेंट आहे. सूर्यवंशी अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा आणि साहसाने परिपूर्ण आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचाही मोठा कॅमिओ आहे. जे प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजन मिळत आहे. अक्षय अजय आणि रणवीरसोबत अॅक्शन करताना दिसला आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटाची खासियत म्हणजे बरीच सारी पात्रं आणि ती सूर्यवंशीमध्येही आहे.
'सूर्यवंशी' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' हा एक मोठा चित्रपट आहे. सूर्यवंशीला महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत.
सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारने २५ कोटी रूपये मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. अक्षयने सिनेमात पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. तेच कतरिनाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांचीही केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडली. तर अजय देवगन आणि रणवीर सिंह यांनी या सिनेमासाठी एक रूपयाही मानधन घेतलं नसल्याची चर्चा आहे. त्यांनी फ्रीमध्ये काम केल्याचं बोललं जात आहे. तर जॅकी श्रॉफने १ कोटी तर जावेद जाफरीने ५० लाख रूपये मानधन घेतलं आहे. देशासह परदेशातही सूर्यंवंशीला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.