पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) नेपाळविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत शतक झळकावून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी हा विक्रम शुभमन गिलच्या नावावर होता. यशस्वीने वयाच्या 21 वर्षे 279 दिवसांत नेपाळविरुद्ध शतक झळकावले, तर शुभमन गिलने वयाच्या 23 वर्षे 146 दिवसांत नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना शतकी खेळी साकारली होती. मंगळवारी झालेल्या सामन्यता यशस्वीने 49 चेंडूंत 8 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांसह 100 धावांची स्फोटक खेळी केली.
यशस्वी जैस्वाल (yashasvi jaiswal) आणि शुभमन गिल (Shubaman Gill) यांच्याशिवाय या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्याही नावाचा समावेश आहे. रैनाने द. आफ्रिकेविरुद्ध (2010) वयाच्या 23 वर्षे 156 दिवसांत, तर राहुलने 2016 मध्ये वयाच्या 24 वर्षे 131 दिवसांत वेस्ट इंडिजविरुद्ध शतक फटकावले होते.
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या जैस्वालने छोट्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेत नेपाळच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. त्याने मैदानभर फटके मारले. आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने आयपीएलचा फॉर्म कायम ठेवला. त्याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक आणि त्यानंतर 48 व्या चेंडूवर शतक झळकावले. यासह, तो भारतासाठी टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला. त्याने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. तसेच यशस्वी हा आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जैस्वालने (yashasvi jaiswal) या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 46.40 च्या सरासरीने आणि 165.71 च्या स्ट्राईक रेटने 232 धावा केल्या आहेत. दरम्यान, एका शतकाव्यतिरिक्त त्याने एक अर्धशतकही झळकावले आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 84 धावांची इनिंग खेळली होती.
यशस्वी जैस्वाल : 21 वर्षे 279 दिवस
शुभमन गिल : 23 वर्षे 146 दिवस
सुरेश रैना : 23 वर्षे 156 दिवस
केएल राहुल : 24 वर्षे 131 दिवस
रोहित शर्मा : 35 चेंडू
सूर्यकुमार यादव : 45 चेंडू
केएल राहुल : 46 चेंडू
यशस्वी जैस्वाल : 48 चेंडू
सूर्यकुमार यादव : 48 चेंडू
या सामन्यात आर. साई किशोरने भारताकडून पदार्पण केले. आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेला साई राष्ट्रगीताच्या वेळी भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने सामन्यात तीन झेल घेत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पदार्पणाच्या सामन्यात तीन झेल घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. साई किशोरला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याने गोलंदाजी करताना आपल्या चार षटकांत खूप प्रभावित केले. त्याने चार षटकात 25 धावा देत एक बळी घेतला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने विजय सलामी दिली. पहिल्या सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला होता. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित संघ असल्याने भारताला उपांत्यपूर्व फेरीत थेट खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 202 धावा केल्या. भारताकडून जैस्वालशिवाय रिंकू सिंगने 15 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी केली. तर ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. नेपाळकडून दीपेंद्र सिंग ऐरी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकात 31 धावा देत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ नऊ गडी गमावून 179 धावाच करू शकला. यशस्वी जैस्वालने भारताकडून शतक झळकावले आणि 49 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी चेंडूवर प्रत्येकी तीन बळी घेतले.