![Yashasvi Jaiswal : जैस्वाल 53 वर्षे जुना विक्रम मोडण्याच्या मार्गावर! 120 धावा करताच भारतीय क्रिकेटमध्ये रचणार इतिहास](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2Fjaiswal.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 3-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे. टीम इंडिया या मालिकेचा शेवट विजयाने करू इच्छितो. त्याचवेळी संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालसाठी (Yashasvi Jaiswal) हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यादरम्यान तो भारतीय क्रिकेटच्या इतिहसातील एक मोठा विक्रम मोडू शकतो.
जैस्वालने या मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो आघाडीवर आहे. आतापर्यंत त्याने मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात 655 धावा वसूल केल्या आहेत. तो आता भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ आहे. जर जयस्वालने मालिकेतील शेवटच्या सामन्यात 120 धावा केल्या तर तो कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनेल.
भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. सुनील गावसकर यांनी 1970/71 वेस्ट इंडिज मालिकेत 4 सामन्यात 774 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, त्याने 1978/79 वेस्ट इंडिज मालिकेत 4 सामने खेळताना 732 धावा केल्या होत्या. या यादीत विराट कोहलीचेही नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 2014/15 ऑस्ट्रेलिया मालिकेत 692 धावा केल्या होत्या.
सुनील गावसकर : 774 धावा
सुनील गावसकर : 732 धावा
विराट कोहली : 692 धावा
विराट कोहली : 655 धावा
यशस्वी जैस्वाल :655 धावा*
यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) या मालिकेत आतापर्यंत 8 डाव खेळले असून 2 अर्धशतके आणि 2 द्विशतके झळकावली आहेत. विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 209 धावा केल्या. तर त्याने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात 2014 च्या नाबाद धावा केल्या. या मालिकेत त्याने 23 षटकार मारले आहेत, जो कसोटी मालिकेत एका खेळाडूने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे.