पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Playoff : आयपीएल 2023 चा लीग टप्पा संपला असून आजपासून (23 मे) प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा (जीटी) सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK)शी होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. बंगळूर येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या लिग सामन्यादरम्यान जोरदार पाऊस झाला होता. सुरुवातीला हा सामना होईल की नाही ही भीती चाहत्यांना लागून राहिली होती. पण सुदैवाने तो सामना पूर्ण झाला. गुजरात टायटन्सने त्या सामन्यात विजय मिळवून आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने कशीबशी प्लेऑफ फेरी गाठली.
आता मंगळवार (दि. 23)पासून प्लेऑफचे सामने सुरू होणार असून पहिल्या क्वालिफायरमध्ये चार वेळच्या विजेत्या सीएसके समोर गतविजेत्या गुजरात टायटन्स (जीटी)चे आव्हान आहे. आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, जर प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान पावसाने व्यत्यय आणला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही तर निकाल कसा लावला जाणार?
साखळी टप्प्यात सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातात. असाच एक सीएसके विरुद्ध एलएसजी हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. पण आता प्लेऑफ फेरीतील सामने रद्द झाल्यास साखळी फेरीतील सामन्याप्रमाणे होत नाही.
प्लेऑफ सामन्यात पाऊस पडल्यास किमान 5-5 षटकांचा खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचाही निकाल लागला नाही तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हरमध्येही निकाल न लागल्यास, साखळी फेरीत चांगला रनरेट आणि अधिक गुण मिळवणा-या संघाला विजेता घोषित केले जाईल.