पुढारी ऑनलाईन : दिल्लीसह एनसीआरच्या काही भागात शनिवारपासून गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिल्लीसह मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात २२ मार्चपर्यंत मुसळधार हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंशांनी जास्त आहे.
उत्तर भारतात १८ ते २० मार्च दरम्यान गडगडाटांसह पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य, पश्चिम, आणि दक्षिण भारतात ढगांचा गडगडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह १८ ते १९ मार्च दरम्यान पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतातील J&K, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबचे उत्तरेकडील भाग आणि हरियाणा, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि मेघालय या राज्यात देखील पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचे सावट आहे. पश्चिम बंगाल, ईशान्य भारतात २० मार्चपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी हलका पाऊस होणार आहे.
२० ते २२ मार्च दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. १९ ते २० मार्च दरम्यान आसाम आणि मेघालय या राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे IMD ने सांगितले आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात देखील वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.