पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच असून, पुढील दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, 2 मार्चपर्यंत सातारा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या पाच दिवसांपासून कोकण वगळता सर्वच भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मात्र अवकाळी पावसासह काही भागांत गारपीट होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही भागांत सलग गारपीट होत आहे. या गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय, नाशिक भागातील द्राक्षपिकास प्रचंड तडाखा बसला आहे. गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट झाली आहे.
हेही वाचा