![राहुल गांधी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2Frahul-gandhi-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आणि पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राहुल गांधी निवडणुकींच्या निकालातून काँग्रेस पक्ष शिकेल, असे राहुल गांधी म्हटले आहे. 'विनम्रतेने आम्ही जनतेच्या निर्णयाचे स्वागत करतो' असे ट्विट त्यांनी केले आहे. तर निवडणूकीत विजयी झालेल्या भाजपला राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानत आपण यातूनच शिकून, पुढे लोकांच्या हितासाठी कार्यरत राहू असेही ते म्हणाले आहेत.
काँग्रेस पक्षाला पंजाबमध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. याव्यतिरिक्त गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पाच राज्यांमध्ये विजयी झालेल्या पक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाहीत जनतेचा निर्णयाला फार महत्व आहे आणि यातूनच आपली लोकशीही मजबूत होते. पाच राज्यांचे निकाल आमच्यासाठी निराशाजनक आहेत. आम्ही उत्तराखंड आणि गोवा, पंजाबमध्ये चांगल्या निकालाची अपेक्षा करत होतो, पण आम्ही जनतेचा आशिर्वाद घेण्यास कमी पडलो, असे सुरजेवाला म्हणाले.
सुरजेवाला पुढे म्हणाले, पंजाबमध्ये चरणजीतसिंह चन्नी यांच्यासारख्या नम्र आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला होता. पण अमरिंदर सिंग यांच्या चार वर्षाच्या सत्ताविरोधी लाटेतून आम्हाला सावरता आले नाही. आम आदमी पक्षाच्या विजयासाठी आम्ही शुभेच्छा देतो.