पुणे, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार झाले तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा फायदाच होईल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची मला आनंदच होईल आणि आम्ही त्यांचे स्वागत करू. अशी प्रतिक्रिया पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणूक फडणवीस पुण्यातून लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच शुक्रवारी ब्राह्मण महासंघाने फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे केली आहे. त्यामुळे फडणवीस खरोखरच पुण्यातून निवडणूक लढवणार का, या चर्चेने आता जोर धरला आहे.
याबाबत पुण्याचे भाजपचे विद्यमान खासदार बापट यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्याकडे पक्षाचा आदेश महत्त्वाचा मानला जातो. फडणवीस यांना काही संघटनांनी पुण्यातून उमेदवारी द्यावी ही मागणी केली आहे. त्यांना वाटलं त्यानुसार त्यांनी मागणी केली. मात्र पक्ष कोणाला वाटलं म्हणून नाही तर सर्वांगीण दृष्टीने विचार करून निर्णय घेतो. फडणवीस यांच्या कामाचा उरक आणि दूरदृष्टी यामुळे निश्चितच पुण्याचा फायदा होईल. त्यांनी आतापर्यंत पक्ष संघटनेतही चांगलं काम केलं आहे. विकासाचे प्रश्नही मार्गी लावले आहेत.आरक्षण असो की शेतकरी प्रश्न हे सोडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच पुण्यात स्वागतच करू असे बापट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान फडणवीस यांच्या उमेदवारीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांवर अन्याय होईल का असे विचारले असता बापट म्हणाले, आमच्याकडे सगळेच प्रामाणिक आहेत आणि पक्षाचा निर्णय महत्त्वाचा असतो त्यामुळे मलाही पक्षाचा निर्णय मान्य असेल.
हेही वाचा