![विकास ठाकरे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2Fvikas-thakare-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मागणी होती की, मी निवडणूक लढावी आणि पक्षाने माझी उमेदवारी मान्य केली आहे. मी ताकदीने लढवणार आणि जिंकून येणार आहे असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी रात्री तिकीट जाहीर झाल्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
जेव्हा पक्षाने मला नागपूर शहरात कोणतेही पदे दिली नसताना जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे मोठा जनाधार माझ्यासोबत आहे. लोकसभेची निवडणूक ही दोन्ही पक्षांच्या विचारधारेची निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहणार की नाही? यासाठी हा संघर्ष सुरु आहे. गेल्या काही काळात लोकशाही संपुष्टात येत आहे असे वाटत होते. या देशातील जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षासोबत राहील हा मला विश्वास आहे. महत्वाचा मुद्दा विकास तर आहेच पण या निवडणूकीत लोकशाही संरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.
कोणताही लोक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रत्येक प्रतिनिधीला वाटते की, शहराचा विकास व्हावा, एकदा जनतेने निवडून दिल्यानंतर त्या पदावर जाऊन काय काम केले यावरुन विकास करणारा व्यक्ती कोण आहे हे समजेल? असा टोलाही त्यांनी गडकरी यांचे नाव न घेता लगावला. जनतेने त्यांना दहा वर्षे निवडून दिले होते, जनतेने मला देखील या शहराचा महापौर बनवले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली आयआरडीपीची कामे झाली, शहराचा चेहरामोहरा बदलला, मेट्रो, मिहान कागदोपत्री मार्गी लागले, अनेक विकास कामे केली होती. याकडे लक्ष वेधताना ठाकरे यांनी ही लढत जोरदार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.