पुढारी ऑनलाईन डेस्क: आज सुरू होत असलेल्या ९ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. यामुळे संपूर्ण भारतातील पर्यटनाला चालना मिळेल. देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी गेल्या अनेक वर्षांपासून विकसित झाली नाहीत. ही स्थानके विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. 'स्वातंत्र्याच्या अमृतकाळात' विकसित होणारी ही सर्व स्थानके असतील. त्यामुळे आपण यांचा उल्लेख 'अमृत भारत स्टेशन्स' असा करता येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज (दि.२४ सप्टेंबर) पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ वंदे भारत एक्स्प्रे नवीन ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते बाेलत हाेते. (Vande Bharat Express Updates)
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नवीन ९ वंदे भारत एक्सप्रेस राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या ११ राज्यांना जोडतात. त्यामुळे येथील लोकांना वंदे भारतची सुविधा मिळणार आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या देशाची नवी ऊर्जा दर्शवितात. 25 वंदे भारत ट्रेन्स आधीच धावत आहेत, आता त्यात आणखी नऊ गाड्या जोडल्या जातील. वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता सतत वाढत आहे. सध्या १ कोटी ११ लाखांहून अधिक प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला असल्याचेही PM मोदी यांनी नमूद केले. (Vande Bharat Express Updates)
देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने या गाड्या एक पाऊल आहेत. वंदे भारत ट्रेन ही तिच्या संचालन मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असेल. या पायाभूत सुविधेमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचवेल, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
नवीन वंदे एक्सप्रेस गाड्यांमध्ये टक्करविरोधी यंत्रणा 'कवच' समाविष्ट आहे. या ९ वंदे भारत एक्सप्रेसची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या गाड्यांचा रंग नारंगी आहे. या नवीन वंदे भारत ट्रेन उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बेंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा आणि जामनगर-अमेदनगर दरम्यान धावतील. पीएम मोदींच्या व्हिजनमध्ये गेल्या नऊ वर्षांत रेल्वे क्षेत्राचा कायापालट झाला आहे. अनेक नवीन सुविधा बसवल्या जात आहेत, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.