नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आयुष्मान भारत योजनेबाबत (PMJAY) भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा (सीएजी) आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. आधीच मृत्यू झालेल्या ३,४४६ रुग्णांच्या उपचारासाठी एकूण ६.९७ कोटी रुपये देण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण डेटाबेसमध्ये मृत दाखवण्यात आले आहेत.
योजनेच्या डेटाबेसचे ऑडिट करण्यात आल्यानंतर त्यात अनियमितता आढळून आली. योजनेच्या व्यवहार व्यवस्थापन प्रणालीमध्ये आधीच मृत झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी पैसेही दिले गेल्याचे समोर आले होते. हजारो रुग्णांवर आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार होत असल्याचे दाखवले जात होत.
केरळमध्ये अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक ९६६ आढळली.त्यांच्या उपचारासाठी २ कोटी ६० लाख ९ हजार ७२३ रुपये रुग्णालयांना देण्यात आले होते.तर, मध्य प्रदेश मध्ये ४०३ आणि छत्तीसगडमध्ये ३६५ असे रुग्ण आढळले.सध्या या योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रुग्णालयात दाखल आणि डिस्चार्ज दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास,ऑडिटनंतर रुग्णालयाला पैसे दिले जातात.
आयुष्मान भारत योजनेबाबत याआधीही कॅगच्या अहवालात एकाच मोबाईल क्रमांकावर ७.५ लाखांहून अधिक लोकांची नोंदणी करण्यात आली होती आणि तो क्रमांकही अवैध असल्याचे सांगण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतील गरिबांना मोफत उपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१८ पासून ही योजना सुरु करण्यात आली आहे.परंतु,योजनेसंदर्भात नवनवे धक्कादायक खुलासे होत असल्याने साशंकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :