![आम्ही एकत्र आहोत, आमच्यात वाद नाहीत : नाना पटोले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2FUntitled-design-2023-02-09T114219.959.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पक्षांतर्गत काही गोष्टी होत असतात. त्या मोठ्या करण्याची गरज नाही. ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माझ्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्र आहोत, म्हणजेच आमच्यात वाद नाहीत. मात्र, नागपूर, अमरावती विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी भाजपने काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषदेत केला.
बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी विस्तारित काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. या सरकारला वटणीवर आणण्याचा ठराव कार्यकारिणीच्या बैठकीत पास करण्यात आला आहे. 'हात जोडो' या काँग्रेसच्या अभियानातून राज्यातील सरकारची पोलखोल करण्यात येईल. उद्योग प्रमाणे महाराष्ट्रमधील घरकुलाचा निधीही गुजरातला गेला आहे, असा दावा पटोले यांनी यावेळी केला.
केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स विभागाचा गैरवापर करत आहे. पत्रकारांच्यावर होणारा हल्ल्याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा