नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिलांनी त्यांच्या नावासमोर 'सुश्री', मिस', 'कुमारी', 'मिसेस' लिहू नये, अशी मागणी करीत दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे मत नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांला सुनावले. नावासमोर काय लावायचे हे व्यक्तीच्या आवडीवर अवलंबून असल्याने याचिकेतून करण्यात आलेल्या मागणीवर कुठलाही सामान्य आदेश दिला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्या. ए. अमानुल्ला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
या याचिके संबंधी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्यासाठी यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलाने न्यायालयाकडे वेळ मागितला. परंतु, ही कुठली याचिका आहे? तुम्हाला कुठला दिलासा हवा आहे? असे सवाल खंडपीठाने उपस्थित करीत हे सर्व प्रचारासाठी करण्यात आल्याचे मत नोंदवत याचिकाकर्त्याला खडसावले. नावसमोर उपसर्गाचा वापर करावा की नाही, हे सर्वस्वी व्यक्तीवर अवलंबून असते, असे खंडपीठाने सांगितले. कुठल्याही महिलेला त्यांच्या नावासमोर मिस, कुमारी, मिसेस लिहण्यासाठी सांगू नये, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. परंतु, याचा यापर संबंधित व्यक्तीला करायचा असेल. तर त्यांना तुम्ही कसे रोखू शकता, अशा शब्दात खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले.
हेही वाचा