पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ३२.१३ टक्के, तर दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली. राज्य मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेतली.
बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७० हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विज्ञान शाखेतील १४ हजार ६३२, कला शाखेतील ४ हजार १४६, वाणिज्य शाखेतील ३ हजार २८, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २८६ आणि आयटीआयच्या ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीच्या गेल्यावर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदा निकालात किंचिट घट झाली. गेल्यावर्षी ३२.२७ टक्के निकाल लागला होता.
तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ४५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३०.४७ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येते. यंदाच्या परीक्षेत २२ गैरप्रकारांची नोंद झाली.