![कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर! किसान सभेतर्फे आंदोलनाचा इशारा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FMaharashtra-Kisan-Sabha.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र किसान सभेतर्फे आज (दि. २२) भाजप सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी कॉम्रेड राजन क्षिरसागर यांनी याबाबत बोलत असताना सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे अशी प्रतिक्रिया त्यांना माध्यमांशी बोलताना दिली. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालविण्याचे काम मंत्री पियुष गोयल आणि धनंजय मुंडे यांच्याकडून केले जात आहे. केंद्र सरकारने ४०% कांद्याची आयात कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. नाफेडतर्फे कांदा खरेदी पियुष गोयल यांनी दिलेले अश्वासन हे फसवं अश्वासन आहे. महाराष्ट्र किसान सभा याचा धिक्कार करते असे क्षिरसागर यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना आश्वासने देऊन गाजर दाखवण्याचं काम सरकारकडून केले जात आहे. दरवर्षी २५ लाख टन कांद्याची निर्यात होत असते. त्यातून देशाला ५ हजार कोटीपेक्षा जास्त नफा सरकारला मिळतो. शेतीच्या अवजारांवर लावलेले कर, खतांचे वाढलेले दर याचा विचार करता शेतकऱ्यांना हवा तो भाव मिळत नाही. शेतकरी खर्चाच्या ओझ्याखाली आहे, अशा परिस्थिती वाढलेला खर्च तरी सरकारने द्यावा अशी अपेक्षा आहे.
सर्व परिस्थिती पाहता कांदा शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत किसान सभा बसणार नाही. परभणी मधील ब्राम्हणी येथे बुधवारी आंदोलन करणार अशी माहिती क्षिरसागर यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे. या सरकारविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे असं देखील क्षिरसागर यावेळी म्हणाले.
हेही वाचा