ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ऐन दिवाळीच्या काळात गहू, बाजरी, ज्वारी, खाद्यतेले, डाळी, कडधान्य, पेट्रोल, डिझेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दराने उच्चांक गाठला आहे. महागाईमुळे दुकानांमध्ये दिसून येत असलेला शुकशुकाट चिंताजनक असल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत महागाईचा उडालेला भडका सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत करणारा ठरत असून, वारेमाप वाढलेल्या महागाईकडे कोणीच कसे लक्ष देत नाही? अशी विचारणा होऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थकारण हे शेती व्यवसायावर अवलंबून असते. ग्रामीण भागातील नागरिकांना हल्लीच्या महागाईच्या तुलनेत उत्पन्न तुटपुंजेच आहे. परिणामी. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पर्यटन व्यवसायाला देखील मोठा फटका बसल्याने कित्येक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत, तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे. त्यातच आता जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दराने ग्रामीण जनतेचे तर कंबरडेच मोडले आहे. परिणामी, उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थकारण कोलमडून पडले आहे.
महागाईवर नक्की नियंत्रण कोणाचे?
ग्रामीण भागात दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उत्पन्नाच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू प्राप्त करता येत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंचे अचानक वाढलेले भाव शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर व छोटे व्यावसायिक यांना कर्जबाजारीपणाकडे नेऊन आत्महत्या करायला भाग पाडणारे आहेत. या वाढत्या महागाईला कोण आळा घालणार? महागाईवर नक्की नियंत्रण कोणाचे? असे प्रश्न ग्रामीण भागातील भोळीभाबडी जनता विचारत आहे.
हेही वाचा :