पुढारी ऑनलाईन डेस्क : अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी'ने (The Kerala Story) इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 9 दिवसात 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीपासूनच वादात अडकलेल्या या चित्रपटाच्या यशाने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच शनिवारी द केरला स्टोरीने सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या 9 दिवसांच्या कमाईला मागे टाकले आहे. 'द केरला स्टोरी' स्टोरीपुढे अजय देवगणचा भोलाही फिका पडला आहे.
केरला स्टोरीने (The Kerala Story) पहिल्या दिवशी 8.03 कोटींची कमाई केली होती. त्या दमदार सुरुवातीनंतर चित्रपटाने मागे वळून पाहिले नाही. सोमवारच्या कलेक्शनमध्ये घसरण नोंदवली गेली असली तरी, त्यानंतर सुदीप्तो सेनच्या चित्रपटाने केवळ वाढ नोंदवली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 81 कोटींहून अधिक कमाई केली होती. तर दुसऱ्या शनिवारी 100 कोटींहून अधिक कमाईचा टप्पा पार केला.
9व्या दिवशी म्हणजे शनिवारी, The Kerala Story ने सुमारे 19.50 कोटी कमाईसह एकूण 112.87 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाने 9 दिवसांत 95 कोटींचा व्यवसाय केला होता.