पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी टीम इंडियाचे (Team India) शेड्युल्ड खूप व्यस्त आहे आहे. जानेवारी महिन्यापासूनच संघाने आपल्या 2023 च्या मोहिमेला सुरुवात केली. आता 31 मार्चपासून आयपीएल (IPL 2023) सुरू होत आहे. या लिग स्पर्धेच्या समाप्तीनंतर भारतीय संघ पुढे वर्षाअखेरपर्यंत सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल. यात तीन आयसीसी स्पर्धांचा समावेश आहे. जूनमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS WTC) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टीमला आशिया कप खेळायचा आहे. मात्र, आता बीसीसीआयने (BCCI) संघाच्या प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे.
वास्तविक, आयपीएल (IPL 2023) संपल्यानंतर भारत जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (India Tour of West Indies) जाणार आहे. पण या दौऱ्यात थोडा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाला या दौऱ्यात 2 कसोटी सामने, 3 टी-20 सामने आणि 3 वनडे सामने खेळायचे होते पण आता त्यात बदल झाला आहे. आता हा दौरा 10 सामन्यांचा झाला आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या 3 टी-20 सामन्यांऐवजी आता एकूण 5 टी-20 सामने खेळवले जाणार असल्याचे समोर आले आहेत. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
भारताचा (Team India) वेस्ट इंडिज दौरा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. विंडीजमधील हा 10 सामन्यांचा दौरा संपल्यानंतर, टीम इंडीया तीन टी-20 खेळण्यासाठी आयर्लंडला जाईल. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही मालिका खेळली जाणार आहे. क्रिकेट आयर्लंडनेच ही माहिती दिली.
दरम्यान, जून महिन्यात भारतीय संघ (Team India) मायदेशात 3 वनडे सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय यासाठी प्रयत्न करत आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर जूनच्या उरलेल्या दिवसांत श्रीलंका किंवा अफगाणिस्तान विरुद्ध ही मालिका खेळली जाईल, अशी चर्चा आहे.