पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील ९ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने देशातील ९ राज्यातील बिगर भाजप सरकारे पाडली आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.८) लोकसभेत केला. मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर बोलताना सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. (No-Confidence Motion Debate)
मणिपूरमध्ये दंगल, खून आणि बलात्काराच्या १० हजार केसेस दाखल आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? हीच या सरकारची समस्या आहे. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुळे (Supriya Sule) यांनी केली.
सुळे पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या काळात देशात मोठ्य़ा प्रमाणात महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. कृषी मालाला योग्य दर दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा, दूधला दर दिला जात नाही. देशात महागाईबरोबर बेरोजगारीही वाढली आहे. एलआयसीची विक्री करण्याच्या प्रयत्न सरकार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांवर विक्रीची टांगती तलवार आहे. मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. परंतु, या ट्रेनचा गरिबांसाठी काहीच उपयोग नाही. ज्या ठिकाणी रेल्वे मार्गावर थांबा होता, ते बंद केले आहेत, असे सांगून वंदे भारत ट्रेनला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. (No-Confidence Motion Debate)
हेही वाचा