नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजस्थानमधील बेकायदेशीर खाणींविरोधात संत विजयदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५५१ दिवस आंदोलन केले. अखेरिस संत विजयदास आत्मदहन करण्यास भाग पाडण्यात आले असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. बेकायदेशीर खाणकामामध्ये गहलोत सरकारचे मंत्री जाहिद खान यांचेही दोन खाणपट्टे असल्याचे अरुण सिंह यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, याद्वारे पर्यावरणासह हिंदू संस्कृतीदेखील नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिबद्री आणि कनकांचन ही स्थळे हिंदूसाठी श्रद्धेचा विषय आहेत. पंरतु बेकायदेशीर खाणकामद्वारे डोंगराचे सपाटीकरण सुरू आहे. त्यास विरोध करणाऱ्या संतांचा व सर्वसामान्य जनतेचा छळ केला जात आहे. जे सरकार संतांचा छळ करते, ते जास्त काळ सत्तेत राहत नसल्याचाही इशारा सिंह यांनी यावेळी गहलोत सरकारला दिला आहे.
राजस्थानमध्ये आदिबद्री आणि कनकांचन डोंगरावर होणाऱ्या बेकायदेशीर खाणकामाविरोधात संत विजयदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ५५१ दिवस आंदोलन केले. पंरतु गहलोत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि बेकायदेशीर खाणकाम थांबावे, यासाठी संत विजयदास यांना आत्मदहन करावे लागले. हा प्रकार अतिशय गंभीर असून याची सीबीआय चौकशी व्हावी, या संतसमुदायाच्या मागणीशी भाजप सहमत असल्याचे अरुण सिंह यांनी सांगितले.