पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर सिक्कीममध्ये मंगळवारी (दि.४) पहाटे झालेल्या अचानक ढगफुटीमुळे पूर आला. यात आतापर्यंत १४ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप १०२ लोक बेपत्ता आहेत. राज्यातील विविध भागात 3,000 हून अधिक पर्यटक अडकल्याची भीती आहे. चुंगथांग येथील तीस्ता स्टेज 3 धरणात काम करणारे किमान १४ कामगार अजूनही धरणाच्या बोगद्यात अडकले आहेत. वाचा सविस्तर बातमी. (Sikkim floods Update)
संबधित बातम्या
सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही.बी. पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मंगळवार रात्री ११ च्या सुमारास ल्होनाक सरोवरात ढग फुटले. त्यानंतर तलावाचा बांध तोडून तिस्ता नदीच्या दिशेने वाटचाल केली. धरणाच्या बोगद्यात अजूनही १२-१४ कामगार अडकले आहेत. राज्यभरात एकत्रितपणे २६ जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बरडांग येथील लष्कराचे २३ जवान अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्याकडे ताफ्याचे वाहन होते. हायवेला लागून पार्क केलेली जी गाळात बुडाली आहेत,"
राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन (3) अतिरिक्त टीमची मागणी केली आहे, ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. रांगपो आणि सिंगताम शहरांमध्ये एनडीआरएफची एक टीम आधीच सेवेत आहे.अधिकृत अहवालानुसार. NDRF ची एक टीम बचाव कार्यासाठी चुंगथांग येथे विमानाने नेण्यात येणार आहे. राज्यात सध्या अंदाजे 3,000 हून अधिक देशी-विदेशी पर्यटक अडकले आहेत. त्याचप्रमाणे हवाई संपर्कासाठी हवामान सुधारल्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा चुंगथांगला नेण्यात येईल,
चुंगथांग येथील पोलीस ठाणेही उद्ध्वस्त झाले आहे. अधिकृत अहवालानुसार चुंगथांग आणि उत्तर सिक्कीमच्या बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क कनेक्शन विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने सिंगताम, रंगपो, डिक्चू आणि आदर्श गाव येथे १८ मदत शिबिरे स्थापन केली आहेत. तर चुंगथांगशी संपर्क नसल्यामुळे, भारतीय लष्कर आणि इतर निमलष्करी दलांकडून तेथे मदत छावण्या उभारल्या जात आहेत.
हेही वाचा