बावडा, पुढारी वृत्तसेवा : संत श्री तुकाराम महाराजांचा 337 वा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरहुन सध्या देहूकडे परतीच्या प्रवासात आहे. पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यातून नीरा नदी ओलांडून पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १५) सराटी (ता. इंदापूर) येथे प्रवेश केला. श्रीक्षेत्र देहूला पालखी सोहळा दि. २४ रोजी पोहचणार आहे.
श्री क्षेत्र पंढरपूरहुन नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा बुधवारी (दि. १३) परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्यानंतर सोहळ्याचा बुधवारी रात्रीचा मुक्काम वाखरी (ता. पंढरपूर ) तर गुरुवारी (दि. १४) रात्रीचा मुक्काम महाळुंग (ता. माळशिरस) येथे झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यात सराटी येथे स्वागत करण्यात आले. नंतर पालखी सोहळा दुपारी २.१५ वा. बावडा येथे दाखल झाला.
बावडा येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, निरा भिमा कारखान्याचे माजी संचालक विकास पाटील, अंकुश घाडगे, कुंडलीक अनपट, शंकरराव घाडगे आदींनी तोफा वाजवून स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याने बावडा येथील हिवरकरवस्ती येथे विसावा घेतला. त्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी वडापुरी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी दाखल झाला.
शासनाने पालखी सोहळ्यासोबत पोलीस बंदोबस्त, ॲम्बुलन्स आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालखी सोहळा लासुर्णे (दि. १६), बऱ्हाणपुर (दि. १७), हिंगणीवाडा (दि. १८), वरवंड (दि. १९), उरुळी कांचन (दि. २०), नवी पेठ – विठ्ठल मंदिर,पुणे (दि.२१, २२), पिंपरी गाव (दि. २३) याप्रमाणे मुक्काम करून श्री क्षेत्र देहूला दि. २४ जुलै रोजी दाखल होईल.