![Shoaib Akhtar on Team India | ‘पाकिस्तान को सुकून होगा!’ शोएब अख्तरची टीम इंडियावर टीका](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FOnly-For-ShambhuRaj30-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गिलच्या 121 धावांच्या शानदार खेळीनंतरही आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील सामन्यात भारताला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियावर टीका केली आहे. (Shoaib Akhtar on Team India)
स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संघात महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत पाच बदल केले. यामध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली होती.
बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात बदली खेळाडूंची कामगिरी काही विशेष नव्हती. शाकिब अल हसनच्या शानदार खेळीमुळे बांगलादेशने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा सहा धावांनी पराभव झाला. (Shoaib Akhtar on Team India)
'रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने सामन्याचे विश्लेषण करताना टीम इंडियाचा खरपूस समाचार घेतला. हा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा असून तुम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही, असे तो म्हणाले. श्रीलंकेकडून पराभूत होऊन पाकिस्तान संघ आधीच बाहेर पडला आहे. यावेळी शोएब म्हणाला की, पाकिस्तानचे चाहते बांगलादेशविरुद्ध भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करतील. यात माझाही समावेश आहे.
शोएब म्हणाला, भारतने सामना हरला आहे. हा लज्जास्पद पराभव आहे. मी म्हणेन की भारत सामना हरला ही पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी काहीशा दिलासादायक बाब आहे. ही माझ्यासाठीही दिलासादायक बाब आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा असून खेळाडूंनी जागे होण्याची वेळ आली आहे. काही सामने जिंकल्यानंतर तुम्ही इतर संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचे शतक व्यर्थ गेले. भारताला जागे होण्याची गरज आहे. मी टीम इंडियाला निराश होऊ देणार नाही, पण बांगलादेशने या विजयाने दाखवून दिले की ते स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले आहेत.
एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अख्तरने कोणत्याही संघाला प्रबळ दावेदार म्हणून संबोधण्यास नकार दिला. आणि पुढे म्हणाला की, ही स्पर्धा कोणीही जिंकू शकतो. 'आम्ही म्हणत आहोत की पाकिस्तान आणि भारत विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. हे दोघेही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह उपांत्य फेरीत पोहोचतील. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनच्या 80 धावा, तौहीद ह्रदोयच्या 54 धावा आणि नसूम अहमदच्या 44 धावांच्या जोरावर 265 धावा केल्या होत्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात टीम इंडियाला 49.5 षटकांत 259 धावा करता आल्या. शुभमन गिलने १३३ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने 42 धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. तर तनझीम हसन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्णधार साकिब आणि मेहद हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा :