निवडणुकीत विरोधकांचा राजकीय कोथळा काढू : उद्धव ठाकरे | Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray

निवडणुकीत विरोधकांचा राजकीय कोथळा काढू : उद्धव ठाकरे | Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी निवडणुकात विरोधकांच्या राजकीय कोथळा काढणार, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. आमचे हिंदुत्व हे मातीशी जोडलेले हिंदुत्व आहे, ते शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray

ते म्हणाले, "भगव्याशी गद्दारी करणारा या मातीत ठेवायचा नाही. कुरुलकरबद्दल संघाची आणि भाजपची भूमिका काय आहे? आमचं हिंदुत्व मातीशी जोडलेले आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहाणार नाही. हिंमत असेल तर मुंबई महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घ्या, आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ."

मराठा आंदोलकांवर लाठीमार करणारा डायर कोण? Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray

ठाकरे यांनी या वेळी मराठा आणि धनगर आरक्षण प्रश्नावरही मत व्यक्त केले. ते म्हणाले, "महाराष्ट्रात आणि देशात बरेच प्रश्न आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आज धनगर समाजाला साद घातली, ही चांगली गोष्ट आहे. अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर अत्याचार झाले, हे जनरल डायरचे सरकार आहे. मी मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न होता, पण आम्ही लाठीमारचा आदेश दिला नव्हता. जालन्याचा डायर कोण, याची चौकशी का नाही झाली. हा विषय लोकसभेत सोडवावा लागेल. सर्वांना न्याय देणारा निर्णय संसदेत व्हावा." जाती जातीत भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "मी घराणेशाहीचा पाईक आहे, पण ज्यांना कुटुंब संस्थाच माहिती नाही, ते आम्हाला काय बोलणार. सद्दाम हुसेन, हिटलर, स्टॅलिन यांची घराणी कुणाला माहिती आहेत? ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती नाही, त्यांना निवडायचे का ते तुम्ही ठरवा.

ते म्हणाले, "आपण अपात्रतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालय दररोज यांचे गाल फोडत आहे. या देशात घटना, सर्वोच्च न्यायालय, लोकशाही टिकणार आहे की नाही याकडे आमचे लक्ष आहे. जर हिंमत असेल तर भाजपने निवडणुका लावून दाखवाव्यात." आमच्या लोकांना त्रास देऊ नका, अन्यथा आमचे सरकार येताच तुम्हाला उलटे टांगू. हा इशारा सरकारी अधिकाऱ्यांनाही आहे.

'मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव' | Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray

बुलेट ट्रेनचा फायदा मराठी माणसांना होणार आहे? मुंबई-महाराष्ट्र बकाल करण्याचा डाव आहे, मला ते मोडून काढायचे आहे. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईची स्वायत्ता मारली जात आहे. सगळी महत्त्वाची केंद्र मुंबई बाहेर नेले जात आहेत. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशीच करायची असेल, पीएम केअर फंडापासून सगळ्या राज्यांची चौकशी करा. आम्ही मुंबई वाचवली, पण मुंबईची बदनामी केले जात आहे. तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवत होता, आणि गोरगरिबांना पाच रुपयात जेवण दिले, असे ते म्हणाले. सरकारा आता धारावी गिळायला निघाले आहे, हा विकास मित्राचे खिसे भरण्यासाठी होणार आहे. गिरणी कामगारांच्या मुलांना धारावीत घरे द्यावीत, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना घेराव घाला | Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray

दुष्काळीस्थिती आहे, टँकर सुरू झाले आहेत. पण पीक विमा कंपन्यांनी आग्रीम देऊ केलेली नाही. शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बरोबर उभा राहील. शेतकरी वाऱ्यावर आहेत, समाज रस्त्यावर आहेत, अशा स्थितीत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालावाते, असे आदेशही त्यांनी दिले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news