नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानांमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे महाविकास आघाडीतही तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. आता हा तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या नाराजीबाबत त्यांनी काँग्रेला कळवली आहे. यानंतर काँग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी सावकरांवर आपलं जाहीररित्या व्यक्त केले. यानंतर जाहीरसभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या टिप्पणीवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे मविआतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीतून उद्धव ठाकरे गटाने सभात्याग करत आपली नाराजी दाखवून दिली होती.
विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला.सावरकरांना लक्ष्य केल्याने महाराष्ट्रात विरोधी आघाडीला काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले. या बैठकीला इतर विरोधी पक्षांसह राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील उपस्थित होते. सावरकर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते, असेही पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले. विरोधी पक्षांची खरी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाशी आहे, असा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. दरम्यान, आता याप्रकरणी काँग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :