Sharad Pawar : कपिल देव यांच्यानंतर शरद पवारांनाही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नव्हते?

Sharad Pawar : कपिल देव यांच्यानंतर शरद पवारांनाही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नव्हते?
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बीसीसीआयचे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नव्हते अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या टीमचे कर्णधार कपिल देव यांनाही निमंत्रण नसल्याचे ते स्वतः म्हणाले होते. यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
क्रिकेट विश्वचषकाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतरही देशवासीयांनी भारतीय संघाच्या विश्वचषकातील एकूण कामगिरीबद्दल कौतुक केले. दरम्यान, कपिल देव यांनी आपल्याला अंतिम सामन्याचे निमंत्रण नसल्याचे म्हटले होते. तसेच १९८३ मध्ये विश्वचषक खेळलेल्या सर्व खेळाडूंना निमंत्रण असायला हवे होते अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.
कपिल देव यांच्यापाठोपाठ शरद पवारांनाही निमंत्रण नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी क्रिकेटसाठी अनेक वर्ष काम केले. देशात क्रिकेटशी संबंधित सर्वात मोठी संघटना असलेल्या बीसीसीआयचे ते अध्यक्ष होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे, त्यामुळे त्यांना निमंत्रण दिले जाणे अपेक्षित होते. कपिल देव यांना अंतिम सामन्याचे निमंत्रण मिळाले नाही, ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. आता शरद पवारांना निमंत्रण नव्हते ही माहिती मिळाल्यानंतर यावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

क्रिकेटमध्येही भाजपचा वंशवाद

कपिल देव यांना अंतिम सामन्याचे निमंत्रण नसल्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बीसीसीआयवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. क्रिकेटमध्येही भाजपचा वंशवाद आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर आता शरद पवारांबद्दलची ही माहिती समोर आली आहे यावरही राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news