बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे मला माहित नाही. बावनकुळे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी त्यांच्याच पक्षाने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. तिकीट द्यायला सुद्धा लायक नाही अशा व्यक्तिबाबत मी काय भाष्य करणार ? या शब्दात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानंतर भाजपने राज्यभर आंदोलन केले, यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व काँग्रेसवर टीका केली होती. यावर पवारांना विचारले असता पवारांनी टीका केली. ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात यावर पवारांना छेडले असता पवार म्हणाले की, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. महाराष्ट्र आणि देशाला बारामतीचे महत्त्व माहित आहे म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात असं पवार म्हणाले
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, इंडिया आघाडीमध्ये जे जे लोक सहभागी होतील. त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार म्हणाले.
हेही वाचा