2023 आशिया चषक ( asia cup 2023 ) स्पर्धेचे पाकिस्तानात आयोजन करण्यात येणार आहे. दुबई येथे झालेल्या बैठकीत आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) हा निर्णय घेतला आहे. एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. आशिया चषक एखाद्या तटस्थ स्थानाऐवजी पाकिस्तानमध्ये खेळला जावा, असेही जय शहा यांनी मत मांडले. सूत्रांच्या माहितीनुसार PCB आणि BCCI यांनीही ACC च्या या निर्णयाची पुष्टी केली आहे. जय शहा म्हणाले की, 2023 मध्ये पाकिस्तानात होणारा आशिया चषक हा वनडे फॉर्मेटचा असेल. तर श्रीलंका येथे 2024 मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करेल, पण ती स्पर्धा टी 20 स्वरूपात खेळली जाईल.
त्याचप्रमाणे 2024 मध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. त्याआधी, टी 20 आशिया चषक ( asia cup 2024 ) स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत केले जाईल. 2024 मध्ये देखील टी 20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ACC आग्रह धरेल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, BCCI आणि PCB यांच्या सूत्रांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु हे स्पष्ट आहे की आशिया चषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तयारी म्हणून आयोजित केले जाईल. आयपीएलनंतर आशिया कपचे आयोजन केले जाईल. आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केल्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा देखील करू शकते. गेल्या वेळी भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता. पण दुबई येथे पार पडलेल्या बैठकीदरम्यान BCCI चे सचिव जय शहा यांनी एक वेगळाच ॲप्रोच दाखवला. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या वेगळ्या ॲपोचवरून असे दिसते की भारत देखील पाकिस्तानात ब-याच वर्षांनी क्रिकेट खेळेल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की पाकिस्तान २०२० मध्येच आशिया चषक आयोजित करणार होता, परंतु भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्याचबरोबर पुन्हा एकदा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे की टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यासाठी जाईल का?
यावेळी पाकिस्तानच्या यजमानपदाच्या बैठकीचे अध्यक्ष बीसीसीआयचे सचिव जय शहा होते. म्हणजेच, कुठेतरी त्यानी हे मान्य केले असावे, ज्यामुळे यजमानपद शेजारच्या देशाकडे सोपवण्यात आले. या अहवालात असेही सांगण्यात आले की जय शहा यांनी PCB चेअरमन रमीज राजा यांना आयपीएल फायनल साठी आमंत्रित केले होते. मात्र, काही कार्यक्रमांमुळे राजा पोहोचू शकले नाही.
जर भारतीय संघ 2023 मध्ये आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला तर PCB चे नवनियुक्त चेअरमन रमीज राजा यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरू शकते. श्रीलंका संघावर हल्ला झाल्यानंतर सर्व देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देत आहेत. अलीकडेच, न्यूझीलंडने मालिकेचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी परतण्याची घोषणा केली होती. यानंतर इंग्लंडने त्यांचा पाकिस्तान दौराही रद्द केला.
2023 मध्ये, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. या स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धाही आयोजित केली जाईल. असे मानले जाते की आयपीएल नंतर लगेचच आशिया कप आयोजित केला जाऊ शकतो. बरं आता प्रश्न असा आहे की, भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाईल का? केंद्र सरकार टीम इंडियाला पाकिस्तानला जाऊ देईल का? भारत सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याशी किंवा त्यांच्या भूमीवर कोणतीही मालिका खेळणार नाही. आशिया चषक २०२० पाकिस्तानमध्येच होणार होता पण बीसीसीआयने टीम इंडियाला तेथे पाठवण्यास नकार दिला. यानंतर श्रीलंकेला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आणि कोरोना विषाणूमुळे स्पर्धा पुढे ढकलावी लागली.