सातारा : पुढारी वृत्तसेवा तीन मुले झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उभे राहता येणार नाही, असा निर्णय घेतल्यानंतर लोकांनी याबाबत विचार केला. लोक राजकारणासाठी का होईना थांबले आहेत. त्यामुळे अशी व्यवस्था तयार करा की, एवढी झाडं लावल्याशिवाय उमेदवाराला निवडणुकीला उभेच राहता येणार नाही. असा निर्णय घेतल्यास इंटरनॅशनल फोरमची आवश्यकता भासणार नाही. सगळ्याच पक्षांनी एकमताने निर्णय घ्यावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात 'ग्लोबल वॉर्मिंग' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती ना. निलम गोर्हे, मंत्री बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.
रामराजे निंबाळकर म्हणाले, जागतिक तापमान वाढीवर काही प्रश्न विचारले गेले तर आमदार, खासदार, निवडणुकीचा अन्य उमेदवार असेल तर त्याला उत्तरे देता आली पाहिजेत. थोडक्यात परीक्षा घेवून जर उमेदवारी दिली तर काय होईल? असे केले तर त्या उमेदवाराला काम करावे लागेल. मत मागताना हे विचारले जाणार असल्याने हे आमदारांना झाडे लावावे लागतील. आमदार जोपर्यंत हे करत नाहीत तोपर्यंत यातील वेगाने काहीही होणार नाही. आता आमची राहिलीतीच किती वर्षे संगळे संपायला? म्हणजे सगळे संपलेले नाही. नाहीतर काहीजण वाटच बघतायंत, असाही टोलाही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला आहे.