राव-ठाकरे यांचे भावी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले… | पुढारी

राव-ठाकरे यांचे भावी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले...

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यांना भेटून आनंद झाला. अनेक विषयांवर आमचे एकमत झाले. देशातील राजकारण, विकास कामांवर चर्चा झाली. महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले. आमच्या बैठकीचा चांगला परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आमची लढाई लोकशाहीसाठी आहे. मी उद्धवजींना तेलंगणात येण्याचे निमंत्रण देतो, हैदराबाद येथे आम्ह बैठक घेवून पुढची रणनिती ठरवू, अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज दिली. के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राव पत्रकार परिषदेत बोलत होते.

Image

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. तेव्हा उद्धव यांनी केसीआर यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात भाजपला सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न के. चंद्रशेखर राव यांनी सुरू केले आहेत. त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दोघांच्या भेटीनंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांचा अत्यंत वाईट पद्धतीने गैरवापर होत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने त्यांचे धोरण बदलावे, तसे न केल्यास त्यांना त्रास होईल. देशाने अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मोदी सरकारल लगावला.

गेल्या ७५ वर्षांनंतर देशात काय विकास झाला, काय प्रगती झाली हे पाहणे आवश्यक असून देशातील राजकारणही बदलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत देशातील राजकारण बदलण्याच्या विषयावर दीर्घ चर्चा झाली आहे. मला उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून आनंद झाला. आता देशातील इतर नेत्यांशी मी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button