नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे नागपूर शहराची धूळधाण झाल्यावर आता विरोधकांनी नागपूरच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली आहे. हाच काय नागपूरचा विकास, असा सवाल केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
संबंधित बातम्या
खासदार राऊत म्हणाले की, नागपुरात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. लोकांची घरे, बंगले, झोपड्या पाण्यात गेल्या आहेत. फडणवीस हे स्वत:ला नागपुरचे सुपुत्र मानतात. नागपुरात पावसाचा धुडगूस सुरु असताना फडणवीस हे देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर श्री गणेश दर्शनात अडकले होते. त्यांच्यावर टीका झाली, तेव्हा ते नागपुरला गेले, असा दावाही राऊत यांनी केला. आम्हाला मुंबई सांभाळता येत नाही, अशी टीका सातत्याने भाजपकडून केली जाते. त्यानंतर आपण नागपूरमध्ये बदल घडवला आहे, अशी टीमकीही भाजपकडून वाजवली जाते. खरे तर आता सुधारणा हवी, टीकाटिप्पणी करण्यात काही अर्थ नाही. आपत्ती व्यवस्थापनात सरकार नागपूरमध्येच पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.