पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांचे आंतरधर्मीय लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला ४२ वर्ष पूर्ण झाली. १९८२ साली आंतरधर्मीय लग्न झाल्यानंतर नसीरुद्दीन शाहा यांच्या कुटुंबीयांनी कधीच आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव आणला नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री आणि नसीरुद्दीन शाहा यांची पत्नी रत्ना पाठक यांनी दिलीय.
एका मुलाखतीत त्यांना आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा रत्ना पाठक म्हणाल्या, नसीरुद्दीन यांच्या कुटुंबीयांनी कधीच धर्मांतर करण्यास सांगितले नाही. त्यांनी त्यांच्या यशस्वी जीवनाबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या, "माझ्या लग्नासाठी माझे वडील फार आनंदी नव्हते. पण दुर्दैवाने आमचे लग्न होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आई आणि नसीरुद्दीन यांच्यातील नातं फार काही चागंलं नव्हतं.
पण कालानुरुप या गोष्टी बदलत गेल्या. पुढे त्यांचे संबंध सुधारले आणि मैत्रीही झाली. नसीर यांच्या कुटुंबीयांनी धर्मांतराचा कधीच उल्लेख केला नाही. मी जशी आहे, तसं त्यांनी मला स्वीकारलं. माझ्या सासरी माझी सर्वांशी चांगली मैत्री झाली. त्यामुळे मी खूप नशीबवान आहे. मी पाहिलंय की, अनेकांना लग्नानंतर स्थिरावण्यास त्रास होतो."
आपल्या यशस्वी सहजीवनाविषयी त्या म्हणाल्या, "लग्न झाल्यावर एकमेकांचं नीट ऐका. एकमेकांशी खुलेपणाने बोला. नसीरुद्दीन यांनी खूप संघर्ष केलाय, मी त्याचा माझ्यापेक्षा खूप जास्त आदर करते. कारण मला त्या गोष्टी खूप सहज मिळाल्या होत्या. नसीर एका विशिष्ट प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला आहे. नसीरने सुरुवातीच्या काळात मला सांगितलेलं आठवतं की, नात्याला पती-पत्नी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असं लेबल न लावणं चांगली कल्पना आहे. एकमेकांशी उघडपणे बोला. संवाद साधा. आम्ही आमच्या मुलांबरोबरही याच गोष्टी केल्या आहेत."
हेदेखील वाचा –