पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा: द राइज' या चित्रपटापासून अभिनेत्री रश्मिका मंदाना ही चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यावर्षी लग्न करणार असल्याची चर्चा अनेक माध्यमांवर जोरदार सुरू होती. तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या या अफवांवर रश्मिकाने मौन तोडले आहे. ''माझ्याकडे सध्यातरी या गोष्टींसाठी वेळ नाही, वेळ आल्यावर मी नक्कीच लग्न करेन" असे तिने एका Fm ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.
नवीन वर्षात या दोघांनीही गोव्यात एकत्र वेळ घालवला होता. तसेच दोघेही मुंबईत एका डिनर डेटवरही दिसले होते. त्यानंतर ते लग्न करणार असल्याची चर्चा होती. जेव्हा अशा बातम्या येऊ लागल्या, तेव्हा हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. एका 'एफएम' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली की, "माझ्या आणि विजय देवरकोंडाबाबत अनेक माध्यमांवर सध्या सुरू असलेली चर्चा ही खोटी आहे. ही फक्त टाईमपास अफवा आहे. माझ्याकडे लग्नासाठी अजून बराच वेळ आहे. वेळ आल्यावर मी नक्कीच लग्न करेन. मला मी जशी आहे तसेच राहू द्या."
'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या यशामुळे दक्षिणात्य प्रसिद्घ अभिनेत्री रश्मिका मंदाना ही भारतभर प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता अल्लू अर्जून महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. यामधील तिच्या श्रीवल्लीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यादरम्यान तिचे वैयक्तिक आयुष्यही चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. रश्मिका आणि विजय यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.